श्री क्षेत्र वडवाळ

1) श्रीगोपाळकृष्णाचे मंदिर-
भक्त हेग्रस हे श्रीनागनाथांच्या सेवेस तत्पर असत.त्यांच्या सेवेत त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही.सेवा करत असतांना रोज ते नेहमीप्रमाणे आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी म्हणून पंढरपूर येथील गोपाळपुरास जात असत.एके दिवशी श्री नागनाथांनी हेग्रसासविचारले, ‘ रोज तू कुठे जातो?’त्यांचे उत्तर ऐकल्यावर म्हणाले ‘ ह्यामुळे तुला श्रम होतात तर आपण त्या गोपाळपुरातील श्रीकृष्णास इकडेच आणु.’म्हणून रात्रीतून गोपाळपुरातील त्या गोपाळकृष्णांचे मंदिरच गोपाळकृष्णांच्या मूर्तीसह अलगद उचलून आणून वडवाळ येथे ठेविले. हेगरस ब्राह्मण लागून । होता श्रम दारूण । आणिलेसि तू बां गोपाळकृष्ण । पंढरीहूनी नागेशा ॥ आणि तू आता येथेच दर्शन घेत जा म्हणून सांगितले. अशाप्रकारे भक्त हेग्रसांचे श्रम त्यांनी वाचविले.(ते मंदिर अद्यापि वडवाळ येथे उभे आहे.त्यातील श्री गोपाळकृष्णाची मूर्ती ही प्राचीन असून भव्य अशी उभ्या अवस्थेत आहे.)ही मूर्ती उत्तम शिल्पाचे प्रतीक आहे.ह्या मंदिरास पाया नाही.
2) श्रीहेग्रस समाधी –
श्रीनागनाथांनी आपल्या अवतार कार्य समाप्तीचा संकेत दिला त्यावेळी भक्त हेग्रसांना गहिवरुन आले.आज आपली जी स्थिती आहे ही सद्गुरु नागेशांच्या कृपेमुळेच आहे.आपल्या मनातील इच्छेप्रमाणे श्रीनागेशांनी आपल्या आईला दर्शन देऊन कृतार्थ करुन सस्वरुपात मिळविले.त्याप्रमाणे आजपर्यंत मोहोळ व वडवाळवासियांचा व तिमण्णा, बहिरंभठ, एकलिंग तेली यांचा उध्दार केला हे त्यांचे महत्कार्य आपल्या समोरच घडले. अशा सद्गुरुंना गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे. त्या शिवाय आपण त्यांचे उतराई होऊ शकत नाही व उतराई होणे आपले कर्तव्यच आहे.असा विचार त्यांच्या मनात सतत घोळू लागला.एके दिवशी श्रीमहाराज खर्गतीर्थावर आले असता हेग्रसांच्या मनात विचार आला की गुरुदक्षिणा काय द्यावी?आपली कायाच (शरीर) त्यांच्या चरणी अर्पण करण्याशिवाय आपल्याजवळ दुसरे काय आहे?तर आपली कायाच त्यांना अर्पण करावी म्हणुन शस्त्राने आपले शिर देहापासून वेगळे करून श्रीमहाराजांना ओवाळिले.
भक्त हेगरस पुर्व मुख उभा राहून | हाती दिव्य खड्ग घेऊन |
आपले शिरकमल उतरवून | देवे ओवाळिले ||
( श्री अज्ञानसिध्द)
हे आपल्या भक्ताचे कृत्य पाहून श्रीनागनाथ महाराज चकीतच झाले.त्यांनी हेग्रसांना मोठा आशिर्वाद दिला. तेथील भक्त गणांनी व ग्रामस्थांनी श्रीहेग्रसांची समाधी श्रीनागनाथांनी भक्त हेग्रसांसाठी गोपाळपूरहून जे श्रीकृष्ण मंदिर आणुन दक्षिण दिशेला ठेवले त्या मंदिरातच बांधली. हे समाधी मंदिर पाहण्यासारखे आहे. या मंदिराचे बांधकाम म्हणजे मोठे मोठे दगड एकमेकांवर रचलेले आहेत. हे दगड बाहेरून ओबड धोबड असुन आतुन खसखसीसारख्या टाकीने सफाईदार केलेले आहेत. बांधकामासाठी चुना किंवा तत्सम कोणताही पदार्थ वापरलेला नाही. थोडक्यात हे समाधी मंदिर म्हणजे बांधकामाचा उत्कृष्ट नमुनाच होय.

3) मुंगीचा धोंडा-
वडवाळ येथे श्रीनागनाथांनी एक मोठा चमत्कार केला.सरकाळीचा (कडब्याचा) एक गाडा तयार केला. तो गाडा ओढण्यासाठी माकुडे (मुंगळे ) लावले. त्या अशा गाडयावर मोठमोठाले पाषाण लादले व तो गाडा मुंगळे ओढून आणू लागले.ओढून आणलेल्या दगडांचा ढीग आजही वडवाळ येथे पहावयास मिळतोे.त्या ठिकाणाला मुंगीचा धोंडा म्हणून ओळखिले जाते.

3) श्रीबहिरंभट उखळ आणि समाधी –
पैठणला कौण्डिण्य गोत्री बहिरंभट नावाचा वेद शास्त्र संपन्न विद्वान पंडित राहात होता.हा बहिरंभट ब्राह्मण एकदा घरी जेवावयास बसला होता.जेवणात त्यावेळी एकदा एका भाजीला मीठ नव्हते म्हणून त्यांनी आपल्या पत्नीस हाक मारून सांगितले की, ‘ आज भाजीस मीठ नाही.’ हे ऐकून त्यांच्या पत्नीने उत्तर दिले की, ‘आज वयाची साठ वर्षे झाली तर आपल्या जीभेची चव अजून गेली नाही यावर तुम्हांस काय म्हणावे. चवी वाचून अजून नडते तर ह्या देहाचे कल्याण कधी व्हावे.’
तुम्ही ज्ञानी आचारवंत । लवणाची मानीता खंत ।
कैसे होते साधु संत । सांगा नाथा मजला ॥
हे ऐकून बहिरंभटांना पश्चाताप झाला.त्यांना आजवर गेलेल्या आयुष्यात आपण कांहीच कमविले नाही याची लाज वाटू लागली.गेले ते आयुष्य वाया गेले, असे तीव्रतेने वाटू लागले.
पश्चाताप होई बहिरंभटा । जागृती दिधलीस या भटा ।
आता रिघतो मी त्या वाटा । त्वाची माझी गुरु मावुली ॥
तू माझे खरे डोळे उघडलेस आज पासून तूच माझी गुरू आहेस असे म्हणून आपल्या पत्नीच्या पायावर त्यांनी डोके ठेवले व मी माझ्या जीविताचे कल्याण केल्याशिवाय तुला तोंड दाखविणार नाही असे म्हणून घरदार सोडून आत्मकल्याणास्तव ते घराबाहेर पडले,
माथा लववी पायावर । त्वाची गुरू माझा थोर ।
चाललो मी आता सत्वर । गुरू शोधात भामिनी ॥
सद्गुरू शोधण्यासाठी ते दूरपर्यंत गेले, ‘मला कोण आत्मकल्याणाचा मार्ग दाखविल?’हा प्रश्न लोकांना विचारीत.पुढे त्यांना यवन लोक भेटले.त्यांनी सांगितले आमच्या धर्माचा तुम्ही स्विकार करा.आमच्या धर्माच्या आचरणामुळे तुम्हाला आत्मकल्याणाचा मार्ग निश्चित मिळेल व तुमचे जीविताचे कल्याण होईल. पण त्यासाठी
आधी करावे धर्म परिवर्तन । शिखा त्यजुनी सुनता करोन ।
मागुती पावेल देव हे जाण । करी धर्म परिवर्तंन ॥
ह्या प्रमाणे त्यांनी ब्राह्मण धर्म सोडून यवन धर्म स्विकारला.यवन धर्माप्रमाणे सुनता करून घेतली.रोज नित्य स्नान-संध्या, वेद पठण करावयाचे सोडून दिले.रोज यवन धर्माप्रमाणे कुराण कलमांचे वाचन सुरू केले, नमाज पडण्यास सुरूवात केली. पुढे कांही दिवस झाले तरीही त्यांचे मन ह्या धर्मांचरणांत रमेना, शेवटी त्यांनी यवन धर्माचा त्याग करावयाचे ठरविले, पुढे फिरत फिरत त्यांना शास्त्री पंडित, आचार्य लोक भेटले त्यांनी त्याना पुन: हिंदु धर्म स्विकारावयास सांगितला. त्याप्रमाणे त्यांनी तो धर्म स्विकारला.पण त्यांच्या शरीरावर दोन्ही धर्माच्या खुणा होत्या.हिंदु धर्माप्रमाणे कानाला छिद्रे होती.आणि यवन धर्माप्रमाणे सुनता केलेली होती.जरी धर्मांतरे झाली तरी ह्या दोन्ही गोष्टी जशाला तशाच होत्या.त्यामुळे ‘मी नेमका कोण?’हाच प्रश्न त्यांच्यापुढे यक्ष म्हणून उभा राहिला.सद्गुरूंचा लाभ होण्यासाठी घरा बाहेर निघाले असता हा दुसराच प्रश्न त्यांना अस्वस्थ करू लागला.ज्याला त्याला मी हिंदु का मुसलमान हाच प्रश्न विचारू लागले.भ्रांतीष्ट चित्ताने ते इकडे तिकडे फिरू लागले.त्यांच्या प्रश्नाचे कोणीही समाधान करू शकेना. असेच भ्रमीष्ट अवस्थेत फिरत असतांना वडवाळ गांवी कोणी एक नागनाथ नावाचे सत्पुरुष आहेत तेच तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतील अशी ग्वाहीसदृश बातमी त्यांना कळली.ते त्या वडवाळ गावाचा शोध घेत घेत श्री नागनाथांच्या पुढे आले व त्यांनी श्री नागनाथांना प्रश्न विचारला.
इतकी खबर ऐकूनी । भैरंभट आले धावूनी ।
देव देखिला नयनी । लागला चरणी ॥
बहिरंभट हो देवासी । काय बोले त्यासी ।
मी हिंदू का मुसलमान । इतुकेच मनी जाण ॥
-अज्ञानसिद्ध
त्या भ्रांतीष्ट अवस्थेतील बहिरंभटास श्री नागनाथांनी पाहिले व
देवे खडग् घेतीले । मस्तकी घातिले ।
चारी सेवक पाचारिले । कांडूनी कुंडनी बारीक केले ।
त्याचे मेण हो बनविले ।
त्याला शिष्याकरवी धरून उखळात घालून कुटून त्याच्या मांसाचा गोळा बनविला.त्या मांसाच्या गोळयावर अग्निसंस्कार केला.
अग्निसंस्कार दिधला तयाला । दिव्य दृष्टीने अवलोकिला ।
करूणामृत सिंचला गेला । तया गुरू मावुली कृपे ।
असे होताच बहिरंभटात जीव आला ते सावध झाले.
बहिरंभट सावध झाला । पाहतो आपणाला ।
जैसा मातेच्या उदरी । पूतळा जन्मला ॥
तैसा दिसू हो लागला । नागनाथ देखिला ॥
-अज्ञानसिद्ध
त्यावेळी श्री नागनाथांनी विचारले तू कोण आहेस हे आता तू सांग. हा प्रश्न करताच
‘ धावुनि चरणासि लागला । ‘
‘ शिरी हस्त ठेविला । ‘
बहिज्या पिशाच्या दातारा । तारक नागेश्वरा ॥
श्रीनागनाथांनी त्यांना दिव्य दृष्टी दिली. त्यावर बहिरंभट म्हणाले
सिद्धोहं सिद्धोहं मुखी ऐसा बोले ।
मागुती गडबड लोळण चरणावरी लोळे ।
सवेचि उठवूनी बाजू सन्निध बैसविले ।
स्वानंदे कुरवाळूनी निजरूपी मिळविले ॥
तद्नंतर बहिरंभटाने आपले सर्व आयुष्य श्रीनागनाथांची सेवा करण्यात घालविले.श्रीनागनाथांना त्यांनी वर मागितला.शेवटी आपला देह श्रीनागनाथ चरणी लीन त्या वडवाळ क्षेत्री केला.तेथेच त्यांची समाधी बांधली.
अद्यापि वडवाळ क्षेत्राला । समाधी उखळ साक्ष भला ।
या दोन्ही गोष्टी (श्री बहिरंभट समाधी व त्यांना कुटलेले उखळ)श्री वडवाळ क्षेत्रात अद्यापि आहेत. बहिरंभटाने घरांतून बाहेर निघण्यापूर्वी विद्वान असल्या कारणाने बरेचसे काव्य केले आहे.सर्वात मोठे म्हणजे श्रीमद्भागवताच्या दशम स्कंधावर टीकात्मक असे ‘ भैरवी टीका ‘ नामक ग्रंथ जवळ जवळ पाऊण लाख ओव्यांचा त्यांनी रचिला. तो अद्यापि अप्रकाशित आहे. कांही जण तो छापण्याचा स्तुत्य कार्यक्रम करीत आहेत. ह्या ग्रंथात ते आपल्या गुरूंचे नांव चिंतामणी घेतात.पुढे श्री क्षेत्र वडवाळ येथे आल्यावर त्यांना श्रीनागनाथ हे सद्गुरू लाभले.व शेवटी आपली जीवनयात्रा त्यांच्या चरणी अर्पणकेली. धन्य ते बहिरंभट .
श्रीबहिरंभट यांना कुटलेले उखळ व पुनर्जीवनानंतरची त्यांची समाधी आजही वडवाळ येथे पहावयास मिळते.हे स्थान श्रीनागनाथ मंदिरासमोर वेशीबाहेर आहे.

4) खर्गतीर्थ –
आसपासच्या लोकांचा परिसर पाहून त्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या गोष्टींची मदत करण्याच्या उदात्त हेतूने मोहोळ व पंचक्रोशीतून आलेल्या मुलांना व लोकांना वडवाळ येथे एकत्र करुन श्री नागनाथांनी खेळ खेळण्यास सुरूवात केली. स्वत:च्या हातातील खड्गाने खणून एके ठिकाणी पाण्याचा डोह (सध्या खर्गतीर्थ म्हणून ते प्रसिद्ध आहे.) निर्माण केले. त्याच्या मध्यभागी बिंडा (चौकोनी आकाराचा कट्टा ) तयार केला. श्रीनागेश म्हणाले की, ‘ मी येथून पुढे जोपर्यंत चंद्र, सुर्य, पृथ्वीतलावर तळपतील तोपर्यंत वायुरूपाने ह्या वेळेला येथे येत जाईन व भक्त हेग्रसाला व पुढे त्यांच्या वंशाला भेट देईन.’ खर्ग डोहात बसण्यासाठी लोकांनी नंतर वावज्या बांधल्या व साधना करण्यासाठी एक गुहाही बांधली. अतिशय सुंदर व भव्य असे त्यावेळी खर्गतीर्थ निर्माण केले गेले.चतुर्थीच्या कार्यक्रमाला खर्ग म्हटले आहे आणि सप्तमीच्या कार्यक्रमाला गण म्हटले जाते. या दोन्ही दिवशी खर्गतीर्थात आल्यावर पावसासंबंधी भविष्य वर्तवून आपल्या भक्तास पूर्वी दिलेल्या वरानुसार बिंडयावर उभा राहून त्यास श्री नागनाथ भेट देतात. हा भेटीचा सोहळा अत्यंत पाहण्यासारखा असतो. ह्यावेळी भक्त लोक भजन म्हणतात.

5) वाळूतील पेरणी
पुढे खर्ग तीर्थातून बाहेर येऊन पेरणीसंबधी भविष्य वर्तविले जाते.येथून जवळच असलेल्या अंतरावर एका झाडाखाली श्रीमहाराज थांबतात. तेथे हेग्रस वंशातील लोक साकी म्हणतात.

6) श्रीवरदबसवराज –
मानूर येथील स्त्रीचा पुरूष बनलेला वरदबसवराज हा ही वडवाळ येथे सेवेला येऊन राहिला. त्याचाही उध्दार करून श्रीनागनाथांनी पश्चिमेस म्हणजे सध्या मोहोळ व वडवाळ या पारंपारिक रस्त्यावर वडवाळपासून थोड्या अंतरावर त्याला जागा दिली व तेथे त्यास निरंतर राहावयास सांगितले. अशा प्रकारे वरदबसवराजाची स्थापना केली.उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र शुध्द पोर्णिमेस सर्व भक्त जन तेथे जाऊन आरती करून येतात. ही प्रथा आजपावेतो निरंतर चालू आहे.

7) मल्हारी मार्तंड व मारुती मंदिर –
ही स्थाने गावाच्या वेशीलगत असून याना त्या स्थानावर जाऊनश्री उत्सव व्यवथित पार पडावा म्हणुन आवाहन व निमंत्रण दिले जाते.उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र शुध्द पोर्णिमेस सर्व भक्त गण तेथे जावून आरतीकरून येतात.ही प्रथा आजपावेतो निरंतर चालू आहे.

8) श्रीतिमण्णा धनगरसमाधी –
एका रानात तिमण्णा नावाचा एक धनगराचा मुलगा शेळ्या राखीत होता.श्रीनागनाथ त्याच्याजवळ आले व त्यांनी त्याच्यापाशी भाकर व पाणी मागितले.त्यावेळी तिमण्णापाशी देण्यास कांहीच नव्हते.त्याने घरी जाऊन आईकडून भाकरी जमल्यास आणण्याचे वचन दिले.व त्याच्या मातेलाही हा वृतांत ऐकल्यावर आनंद झाला व तिने आपल्या मुलाला ‘ खरोखर भाग्यवान ‘ असे संबोधिले.त्याने त्वरेने येऊन भाकर व पाणी श्रीनागनाथांना दिले व त्यांनी त्याच्या त्या अन्नाचा अतिशय आनंदाने स्विकार केला व त्याच्या भक्तीवर ते खज्या अर्थाने प्रसन्न झाले. तिमण्णाला राज्य प्राप्त होईल असा श्रीनागनाथांनी आशीर्वाद दिला व त्याला सात वेळा लंगराने (नांगराने) मारले व श्री नागनाथांच्या आशीर्वादाने त्याला पुढे खरोखर राज्यपद प्राप्त झाले. श्री तिमण्णा धनगर यांची समाधी वडवाळ येथे मुंगीच्या धोंड्याशेजारी आहे.

9) श्रीएकलिंग तेली समाधी –
मानूर येथील श्रीनागनाथांचा शिष्य श्रीएकलिंग तेली हा आपले उर्वरीत आयुष्य श्रीसेवेत घालविण्यासाठी वडवाळ येथे आला व श्रीनागनाथ सेवेत रममाण झाला. एकलिंग तेली याने श्री नागनाथांना वर मागितला की, ‘आपण सुरु केलेल्या उत्सवात प्रतिवर्षी चैत्र शुध्द चतुर्थी व सप्तमी या शुभ तिथीस माझ्या मस्तकावरून जावे.’ श्रीनागनाथांनी श्रीएकलिंग तेली याची मागणी अत्यानंदाने कबुल केली. पुढे श्रीएकलिंग तेली याने वडवाळ येथे श्रीनागनाथाचे मंदिर स्वहस्ते बांधले व त्या मंदिरासमोरच आपण स्वत: समाधिस्थ झाले आणि त्यांना दिलेल्या वरानुसार आजपावेतो प्रतिवर्षी उत्सवात श्रींचा संचार झाल्यावर ते एकलिंग तेली यांच्या समाधीवरुन जातात. श्रीएकलिंगतेली यांची संजीवन समाधी श्रीक्षेत्र वडवाळ येथे श्रीनागनाथ मंदिरात आहे.

10) श्रीउध्दव चिद्घन समाधी-
श्री उध्दवचिद्घन हे सुमारे 1680 च्या सुमारास संतकवी म्हणुन होवून गेले.यांच्या जन्म मोगलाईत ‘धारुर’ या गांवी झाला.त्यांचे मुळ नांव उध्दव व त्यांच्या गुरुचे नाव चिद्घन हे होते.त्यांनी वाड्मयीन सेवा करताना उध्दवचिद्घन हे नाव धारण केले. यांची समाधी श्रीक्षेत्र वडवाळ येथे श्रीनागनाथ मंदिरात आहे.
